१३. नाशिकच्या कारावासात - ३

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१३. नाशिकच्या कारावासात - ३
गुरुजींचे त्यांच्या सर्व साहित्यात चिरसुंदर ठरलेले पुस्तक म्हणजे 'श्यामची आई'. हे पुस्तक म्हणजे मातेच्या महतीचे स्तोत्रच आहे. 'श्यामची आई' वाचताना डोळे ओलावले नाहीत, असा वाचक विरळाच! मुरूजी लिहितात, “हदय भरलेलेच
असे. भराभरा शाईने कागदावर ओतायचे एवढेच उरलेले असे.”

"धडपडणारी मुले" ही त्रिखंडात्मक कादंबरी गुरुजींनी याच वेळी लिहिली. या लेखनाबद्दल ते म्हणतात, “माझ्या मनात ज्या शेकडो कल्पना येत असत. ज्या विचारांची गर्दी उसळे, जी स्वप्ने दिसत, ज्या स्मृती येत, जी दृश्ये आठवत, ज्या
व्यक्ती उभ्या रहात त्या सर्वांतून हे पुस्तक तयार झाले आहे. माझ्या मनाच्या समाधानासाठी हे सारे मी लिहीत असे. प्रत्यक्ष सृष्टीत अतृप्त राहिलेल्या शेकडो हृदयांच्या भुका शांत करण्याचा हा एक मार्ग होता... लिहून झाल्यावर याला काय
नाव द्यावे, असे मनात असे. प्रस्तावनेत शेकडो ठिकाणी आलेला 'धडपडणारी मुले' हा शब्द माझ्या डोळ्यांसमोर आला व तेच नाव या भारुडाला द्यावे असे मी ठरवले.”

इंग्रजी भाषेत सुंदर विचार देणारे कितीतरी साहित्य आहे. एकदा एका खेड्यातले सत्याग्रही धुळे जेलमध्ये असताना विनोबांना म्हणाले होते, 'इंग्रजी आम्हाला येत नाही. आम्ही ते कसे वाचणार?” त्यावर विनोबाजी म्हणाले होते, “गुरुजींसारख्यांचं हे काम आहे.” विनोबांचे हे शब्द गुरुजींनी निरंतर लक्षात ठेवले होते आणि तुरुंगात असताना जे जे सुंदर असे परभावेतील पुस्तक त्यांच्या हाती आले, ते ते त्यांनी मराठीत अनुवादित किंवा रूपांतरित करून प्रसिद्ध केले.
नाशिकच्या कारावासातच त्यांनी 'पुनर्जन्म', 'क्रांतीः' व 'आस्तिक' ह्या कादंबऱ्या, "निळा पक्षी' हे नाटक, 'विश्राम', 'मोलकरीण', “शशी? ह्या कथा इत्यादी पुष्कळ विविध प्रकारचे साहित्यही लिहिले. 'पत्री' काव्यसंग्रहातील पुष्कळशा कवितादेखील गुरुजींनी या काळातच लिहिलेल्या आहेत.

साहित्यनिर्मिती अशी उत्साहाने चाललेली होती, तरीदेखील गुरुजींना अधूनमधून उदास, एकाकी वाटे. अशा वेळी 'अश्रू' हाच एकमेव आधारसखा आहे, असे त्यांच्या मनात येई. उदास एकाकीपणात ह्या अश्रूसख्याची तरी सोबत मिळावी, तो तरी कुणी आपल्यापासून हिरावून नेऊ नये, असे त्यांना वाटे आणि अतिआर्तपणाने ते अश्रुसुक्त आळवीत --

नको माझे अश्रू कधी नेऊ देवा
हाच थोर ठेवा गाझा एक ॥
बाकी सारे नेई धन-सुख-नाम
परी हे लोचन राखी ओले ॥
माझे रूप मज अश्रू दावितात
हेचि तात-मात प्राणदाते ॥
अश्रू माझे थोर ज्ञानदाते गुरू
अश्रू कल्पतरू माझे खरे ॥

'अश्रू' नामक ही कविता गुरुजींच्या 'पत्री' काव्यसंग्रहात असून ती बरीच मोठी आहे. गुरुजींनी अश्रुमहात्म्यच गायलेले आहे. दीन-दलितांच्या अपार करुणेतून स्वामी विवेकानंदांना 'दरिद्रीनारायण' हा शब्द स्फुरला. गांधीजींनी तो उचलला. गुरुजींना आपल्या असहाय स्थितीत 'अश्रू-नारायण' हा शब्द स्फुरला. अश्रूतच त्यांना नारायण दिसला. अश्रूंचे सामर्थ्य गुरुजींनी चांगले जाणले होते. वैयक्तिक जीवनातली रडारड करणारे त्यांचे अश्रू नव्हते, तर 'बुडते हे जन न देखवे डोळा' अशा करणार्द्रतेतून ते आलेले होते.

अश्रूतून अशी चैतन्यशाली स्फूर्ती घेऊन गुरुजी आपले ध्येयजीवन जगत होते. आपले जोवनध्येयदेखील त्यांनी एका गीतात सांगितले आहे.

करीन सेवा तव मौलवान ।
असो अहंकार असा मला न ॥
कथी कुणाचे मजला पुसू दे ।
जलार्द डोळे मग तो हसू दे
अनाथ दीनाजवळी वदेन ।
सुखामृताचे प्रभु शब्द दोन ॥

नाशिकच्या कारागृहातून गुरुजी १९३३ सालच्या ऑक्टोबर महिन्यात सुटले. सुटल्यावर ते अंमळनेर या आपल्या कर्मभूमीत आले.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 427
X

Right Click

No right click