१८. कोल्हापूर १९३२- सयाजीराव गायकवाड

 

वाङ्मय हे बौद्धिक व भावनात्मज्क असे दोन प्रकारचे अस्ते. समाजास हितकारक अशाच वाङ्मयाची रचना करावी असे त्यांनी लेखकांना व वर्तमानपत्रकर्त्यांना आवाहन केले. आपले वाङ्मय विशिष्ट वर्गाने विशिष्ट वर्गासाठीच लिहिलेले आहेसे वाटते. जुन्या ग्रंथास सर्व जातीच्या लेखकांचा हात लागलेला आहे. पण गेल्या ५० वर्षातल्या कादंबर्‍यांची, नाटकातली किंवा गोष्टींची पाने पांढरपेशा वर्गातली व पुण्यामुंबईकडची दिसतात. शास्त्रीय वाङ्मयातही सुतार, लोहार वगैरे खेडवळांच्या उपयोगी पडण्याजोगी पुस्तके नाहीत. सबंध ३०० मैलांचा समुद्रकिनारा महाराष्ट्राच्या कडेला असून मच्छीमारीविषयी किंवा दर्यावर्दीपणासंबंधी एकही मराठी पुस्तक नसावे हे आश्चर्य नव्हे काय? वाङ्मयात सर्व धंद्यांच्या, सर्व वर्गांच्या सर्व स्थळांच्या लोकांनी लिहिलेला ग्रंथसंग्रह असला तर भिन्न भिन्न वर्गांच्या आकांक्षांचे, भावनांचे, विचारांचे व सुखदु:खांचे चित्र त्यात उमटलेले दिसते. त्यामुळे राष्ट्राच्या ऎक्यास ते संवर्धक होते व भाषेतील शब्दसंग्रह वाढतो.

Hits: 660
X

Right Click

No right click