१७. कर्मयज्ञ -२

Parent Category: मराठी पुस्तके Category: सेनानी साने गुरुजी Written by सौ. शुभांगी रानडे

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

१७. कर्मयज्ञ -२

गुरुजींनी नंतरच्या तुरुंगवासात 'गोड गोष्टीचे आणखी पाच भाग लिहिले. 'गोड गोष्टी'च्या दहा भागांनी महाराष्ट्रातील मुलांना वाचनाचे वेड लावले. त्यांचे भावनिक, बौद्धिक भरणपोषण झाले आणि असे घडावे, अशीच गुरुजींची इच्छा होती. हो मातृहृदयाची मनीषाच होती. जे जे कुठे चांगले काही वाचले, ऐकले ते ते आपल्या भाषेत अनुवादित करून किंवा रूपांतरित करून-- भारतीय साज चढवून - त्यांनी मुलांना दिले आहे. त्यातून कितीतरी मुलांनी स्फूर्ती, प्रेरणा व सद्विचार उचलले. गुरुजींची भूमिका मात्र अशी होती-

करी मनोरंजन जो मुलांचे ।
जंडेल नाते प्रभूशी तयाचे ॥

गुरुजींना अभिप्रेत असलेल्या 'मनोरंजना'ला निखळ, निकोप, सर्वस्पर्शी, सुंदर, आनंददायी, सौंदर्यशाली असा निर्मळ सांस्कृतिक आशय आहे. उठताबसता उपदेशाचे कडवट घुटके पाजणाऱ्या किंवा शिस्तीच्या नावाखाली सदाकदा डोळे
वटारणाऱ्या, किंवा तात्पर्यावरच भर देऊन हातात छडी घेऊन बळण लावण्याच्या पंतोजी प्रकाराला मुलांपासून खूप लांब ठेवावे, असेच त्यांना वाटत होते आणि तसेच ते 'मुलात मूल' होऊन मुलांशी वागत होते. निखळ सांस्कृतिक मनोरंजनाला
त्यांच्या मनीमानसी एक 'मूल्य' --व्हॅल्यू- अशी पदवी किंवा प्रतिष्ठा होती.

“नाशिक जिल्हा युवक परिषद' चांदवडला घेण्याचे तेथील तरुण कार्यकर्त्यांनी ठरवले आणि गुरुजींना अध्यक्ष म्हणून बोलाविले. गुरुजी त्या वेळी बडोद्याला होते. प्रकृती ठीक नव्हती, म्हणून त्यांनी 'अध्यक्ष' म्हणून येण्याचे नाकारले तरी
युवकांसाठी ते परिषदेपूर्वीच धावून आले. अध्यक्षपदासारखे मानसन्मान स्वीकारण्यापेक्षा स्वयंसेवक होऊन झटणे, खपणेच त्यांना प्रिय वाटे.

गुरुजी चांदवडला आले आणि जिल्ह्यातील गावोगावी त्यांची भ्रमंती सुरू झाली. नाशिक, निफाड, येवला, विंचूर, इभतपुरी, मालेगाव इत्यादी ठिकाणी त्यांच्या प्रचंड सभा झाल्या. परिषदेच्या तयारीसाठी तेथील कार्यकर्त्यांबरोबर गुरुजींनीही सर्व
तऱ्हेचे कष्ट केले. युवकांची परिषद म्हणजे जणू त्यांच्या घरचेच कार्य. परिषदेच्या मांडवासाठी अंगातला शर्ट काढून गुरुजी खड्डे खणायलाही पुढे सरसावले. “सायकलवर या, झेंडे लावून या, पायी या, ट्रकमधून या, गाणी गात गात या.”
असे सांगत ते सर्वत्र वाऱ्यासारखे फिरले. ठिकठिकाणच्या सभांतून काँग्रेसचा संदेश दिला. काँग्रेसने त्या वेळी घेतलेली युद्धविरोधी भूमिका लोकांना समजावून सांगितली.दिनांक २३-२४ नोव्हेंबर १९४० णेजी युवक परिषदेचे अधिवेशन पार पडले.
खादी-गामोद्योगाच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुजींच्या हस्ते झाले. सेवादल-संघटनेविषयीच्या ठरावाबरही गुरुजी बोलले. त्यांचे ते भाषण अत्यंत प्रभावी झाले.

परंतु या परिषदेच्या निमित्ताने गुरुजी जे आधी जिल्ह्यात ठिकठिकाणी बोलले होते आणि विशेषत: १९ नोव्हेंबरला चांदवडलाच त्यांनी जे भाषण केले होते, त्ते सरकारच्या दृष्टीने आक्षेपार्ह ठरले होते. त्यावरून गुरुजींना अटक करण्याची
कारवाई शिजू लागली होती. याची कुणकूण गुरुजींना लागली आणि तेही जेलयात्रेच्या तयारीला लागले. अंमळनेर, धुळे, पंढरपूर आदी ठिकाणी पाठीवर पोलिसी वॉरंट घेऊनच ते गेले. सभांतून बोलले. अखेरीस पेण येथे त्यांना पोलिसांनी
२७ डिसेंबरला अटक केली. नाशिकच्या तुरुंगात पुनश्च गुरुजी आले. .त्या वेळी तिथे सेनापती बापटही होते. गुरुजींवर खटला भरण्यात आला. त्यानुसार २ जानेवारी १९४१ रोजी त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि
धुळ्याच्या तुरुंगात त्यांना आणून ठेवले.

दरण्यान गुरुजींनी 'श्यामची पत्रे नावाचे पुस्तक लिहून काढले. त्यातून सेवादलाची जातिधर्म निरपेक्ष भूमिका विशद करून सांगितली आहे. 'सेवादल हा माझा प्राणवायू आहे', असे ते म्हणत असत. कारण स्वातंत्रयलढ्यातील नवविचारांनी प्रेरित झालेल्या तरुणांच्या सेवादलासारख्या सर्वांगीण समतेचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेचे महत्त्व ते जाणून होते. आपली ध्येयसृष्टी, स्वप्ने उद्या सेवादलातील क्रांतिनिष्ठ तरुणांकडूनच साकार होतील, अशी दुर्दम्य आशा ते बाळगून होते.
वर्णाश्रम पद्धतीच्या योगाने आलेले माणसामाणसांतील भेद गुरुजींना मुळीच मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी तै-वर्णिकांच्या श्रेष्ठत्वाचे निदर्शक असे यज्ञोपवित घालण्याचे सोडून दिले होते. 'जानवी तोडा नि माणसे सोडा' हो जयप्रकाशजींच्या
सर्वांगीण क्रांतीमधली घोषणा पुढे झाली, पण गुरुजींनी तो विचार केव्हाच अमलात आणलेला होता! अनेक वेळा गुरुजींनी स्वत:ला 'मी शूद्र आहे' असेही म्हणवून घेतलेले आहे.

अस्पृश्यतेविषयीचा त्यांचा कळवळा हा एका व्यापक मानवतेच्या उमाळ्यातून जन्माला आलेला होता. त्यांनी यज्ञोपविताचा त्याग केला आणि मौंजीबंधनाविषयी 'काँग्रेस' साप्ताहिकात लिहिले होते, 'राष्ट्राची मुंज होऊ दे!” ज्ञानाची समता व
सार्वत्रिकता राष्ट्रातील सर्वांच्या वाट्याला आली पाहिजे; ज्ञान हे कोणा वरिष्ठ वर्गाची मिरास होता कामा नये, हाच विचार त्यांनी मांडला आहे. “मुंज म्हणजे काय? गुलामगिरीची कवची फोडून ज्ञान-सूर्याला मिठी मारायला जाणे. गुलामगिरीत ज्ञान नाही; ना विज्ञान ना आध्यात्मिक ज्ञान.”

“सर्वांगीण विषमतेच्या संहारासाठी राष्ट्र स्वतंत्र झाले पाहिजे,” असा विचार ज्या कळकळीने गुरुजींनी या पत्रांमधून मांडला आहे, तसाच “स्वातंत्र्योत्तर समताधिष्ठित समाज हा समाजवादी मूल्यांच्या प्रस्थापनेतूनच निर्माण होईल,” ही श्रद्धाही तेवढ्याच तळमळीने त्यांनी व्यक्त केलेली आहे.

-----------------------------------------------------------------
सेनानी सानेगुरुजी - राजा मंगळवेढेकर - अनुक्रमणिका
>-----------------------------------------------------------------

Hits: 89
X

Right Click

No right click